13 March 2007

उज्ज्वला

फायनल ईयरचा रिझल्ट चांगला लागला होता. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचं कळलं होतं. त्यामुळं आमची गाडी निवांत आरामात सोफ्यावर बसून टि.व्हीचा आनंद लुटत होती. संध्याकाळची वेळ होती. फोन वाजला. "मानदाचा फोन आहे गं.." आईनं आवाज दिला. मॅंडीनं या वेळी कसा काय फोन केला असावा या विचारानं एक मिनिटभर मी ब्लॅंक झाले. "हा मॅंडी बोल!! रिझल्ट बदलला नाही ना गं?" मी घाबरत तिला चाचपडलं. "रिझल्टचं नाही.... एक वाईट न्युज आहे.... उज्ज्वलाचा सकाळी ऍक्सिडेंट झाला..... on the spot गेली. तिचा चश्मा तेवढा रस्त्याच्या आतून पडल्यानं शाबूत आहे गं.... बॉडी काहिच उरली नाही......." मॅंडीचे शब्द कानावरून कानातून सगळीकडून जात होते. "आम्ही तिच्या घराजवळून बोलतोय. मी सुजाता आणि चेतू आम्ही आहोत. काहीच कळत नाहीये गं.... आम्ही सोबतच होतो सकाळी... जस्ट २ मिनिटांनी चुकामुक झाली.... आम्ही पुढं निघालो.... ती मागून होती...." मॅंडी भराभर बोलत होती. तिचा आवाज कापरा होता. अजून काय काय सांगून तिनं फोन ठेवला.... माझा आवाज बदललेला पाहून आई आली होती बाजूला...
मी आणि उजू फायनलच्या प्रोजेक्ट पार्टनर्स. एकत्र कॉलेजात जायचो, एकाच बेंचवर बसायचो.... गप्पांचे विषय, अभ्यास सगळं जुळून आलेलं. खुप हसणारी, मोजकं पण छान बोलणारी उजू आठवली. डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. आई बोलत होती माझ्याशी.... मला काहीच आठवत नव्हतं.... आदल्या दिवशी आम्ही फोनवर बोललेलो आठवत होतं. आणि आज संध्याकाळी उजू नाही हे कसं ऍक्सेप्ट करावं.....
फायनल क्लियर व्हावं म्हणून धडपड करणारी उजू, कॉलेजला उशीर होतोय गं चल म्हणून मागं लागणारी उजू, जोक्सवर खळाळून हसणारी उजू..... रिझल्ट पहायच्या आधी हात घट्ट धरलेली उजू आठवली.
तिची आठवण आली. अजूनही येते, मला आज ही खुप मैत्रिणी आहेत. पण पाठीवर हात ठेऊन नको गं टेन्शन घेऊ म्हणणारी उजू जवळ नाहीये. I miss her.....


07 March 2007

कुठून तरी येतं फुलपाखरू
कुठे उडून जातं
चिमटीमध्ये उरतो रंग तेंव्हा
रंगात पाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथे फसतं
ते वयच असं असतं
कॉलेजमधून परत येताना आशा भोसलेंनी गायलेल्या 'आज कुणीतरी यावे' या गीताचे बोल कानावर पडले. मराठी गाणी कधीच न सोडणारी मी हे गाणं ड्रॉप करणं निव्वळ अशक्य होतं. मनात ओळी येत गेल्या...


आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

खुप वाढलेल्या उन्हानं तापलेली सुकलेली धरा... धरती... झाडावरची पानं ही सुकून गळतात. झाड काटक्या टाकतं. पक्षी उन्हं उतरल्याशिवाय बाहेर पडत नाहीत..... आणि आपल्याला तर नजरही बाहेर काढता येत नाही. आणि अशात एक दिवस असा येतो की आपल्यालाच प्रसन्न वाटतं. हवेत किंचीत गारवा येतो.

जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर,
तसे तयाने यावे

आणि इतके दिवस स्तब्ध असणारा वारा देखिल हळू हळू गारवा पसरायला मदत करतो. हवेची थंड झुळूक मनाला एक दिलासा देऊन जाते. कुठं तरी वळीवाचा पाऊस पडलेला असतो. तापलेली धरणी जराशी थंड होते. मनात येतं जशी ही वळीवाची सर आली तसंच कोणीतरी यावं. नवीन मित्र, नवीन मैत्रिण कोणीतरी मिळावं. एक सखी एक सोबती अशी मिळावी

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे

तो असा असावा ज्यानं मला समजून घ्यावं... माझं मन वाचावं. या क्षणाला माझ्या मनात जे येईल ते समजून उमजून घ्यावं. अनेक वेळा असं होतं.... मनातल्या भावना शब्दात मांडता येत नाहीत. त्या व्यक्त ही करता येत नाहीत. आमची मैत्री अशी व्हावी की मी काही ही न बोलता न सांगता माझं मन कळावं. माझ्या मनातलं गुपित चेहर्‍यावरून ओळखून घ्यावं.... आमच्या मैत्रीची वीण न सांगता घट्ट गुंफली जावी......


सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे


मनं इतकी जुळून यावीत की घर, नाती यांचाही विसर पडावा... अत्यंत विश्वासानं त्याच्या सोबत डोळे बंद करून निघून जावं. कुठं चाललो, कसं चाललो याची तमा नसावी..... अख्ख आयुष्य त्याच्या नावे करून टाकावं.....




-------------------------------
गीतकार - ग दि माडगुळकर
गायिका - आशा भोसले
संगीतकार - सुधीर फडके