11 August 2008

ब्लॉगवर माझी वापसी....

आज जवळ जवळ २ महिन्यांनी मी ब्लॉगवर लिहायला आले. मधले २ महिने खुप धावपळीचे गेले. पॅकिंग, भारतात वापस येणं, इथली सेटलमेंट.... खुप खुप धावपळ झाली. आज दोन महिन्यांनी जेंव्हा ब्लॉगवर गेले तेंव्हा प्रोफ़ाईल विझिट्स पाहिल्या... आणि जवळ उडालेच. १२०० विझिट्स!!! गेल्या वर्षी जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरू केलं होतं तेंव्हा मनात एकदा ही आलं नाही की दिड वर्षात १००० पेक्षा जास्त विझिट्स होतील. इन फ़ॅक्ट १०० विझिट्स ही होतील की नाही असं वाटत होतं. अनेक वेळा असं ही वाटलं की कोणी विझिट करेन की नाही?

माझं पहिलं लिखाण माझे शब्द ह्या श्री. राज जैन यांच्या वेबसाईट्वर झालं. तिथे मला मराठी लिखाणाची चटक लागली असं म्हणायला हरकत नाही! रोज काही ना काही मी तिथे लिहायची. कालांतरानं माझं तिथे जाणं ही कमी झालं आणि नंतर विचारता ती साईटच बंद झाल्याचं कळलं.लिहायची लागलेली सवय घालवावी वाटेना. नुसतं वर्ड मध्ये लिहून ठेवणं ही बरं वाटत नव्हतं. त्यावेळी तात्या अभ्यंकरांच्या ब्लॉगबद्दल कळलं. तिथे जाऊन पाहिलं. मग कळलं की इथं ही लिहिता येतं. मग blogger.com या साईट्ला भेट दिली. तेंव्हा कळलं की हे अजूनच सोपं आहे. कारण माझं गुगल अकाउंट होतं. मग लिहायला लागले. माझे शब्दवर लिहिलेली माझी पहिली कथा ही मी इथं टाकली. शिवाय माझ्या आईनं लिहिलेलं निर्वाण षटकावरील विवेचन इथं दिलं. मग लिहिणं सुचतच गेलं. ड्राफ़्ट्ची सोय असल्यानं अर्धवट लिहून ठेवून नंतर सवडीनं नेट वर टाकलं तरी चालत असल्यानं अजूनच सोप होत गेलं.

मार्च २००७ साली माझ्या ब्लॉगवर मी पहिली पोस्ट लिहिली. शाळेतल्या विद्यार्थ्यानं संदर्भासह स्पष्टीकरण असा प्रश्न सोडवताना असंख्य चुका कराव्या अशी ती पोस्ट होती. आजवर तिला एकही प्रतिक्रिया नाही! आणि मला तिला प्रतिसाद अपेक्षीतही नाही.
पण जसं जसं लिहित गेले तशी सुधारणा होत गेली. आज खुप छान नसलं तरी बर्‍यापैकी लिहिता येतं. प्रतिसाद ही मिळतात. बरं वाटतं.