22 May 2009

पाऊस पडून गेल्यावर

आज संध्याकाळी हवेत थोडा गारवा होता. ती उन्हाळा संपत आल्याची चाहूल होती... कुलरची थंड हवा संपणार, गारेगार कुल्फी आणि आईसक्रिम संपणार, पन्हं आणि रसना संपणार.... दही, आमरस संपणार, छान छान सरबतं संपणार.. थंडाई, ज्युसेस आणि कैरीचे मस्त प्रकार संपणार....

एकीकडे उन पडलं खुप म्हणून आरडा ओरडा करायचा आणि मग वर्षभरानंतर आलेल्या पहिल्या पावसानी गारवा आणला की हाच उन्हाळा संपणार या साठी हु्रहुर करायची.... आज काहिसं वेगळं वाटलं,

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले…
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले....

पाऊस हवाहवासा ही वाटला आणि उन्हाळा संपूच नये असं ही वाटलं. येणारा पाऊस काय काय घेऊन येणार??? थोडी तारांबळ, थोडा गारवा, जुन्या रफी, लता, किशोर, आशा या दिग्गजांच्या कॅसेट्स आणि सीडीज पुन्हा बाहेर येणार... गरम वाफाळलेल्या कॉफी आणि चहाचे मोठे मग्ज बाहेर निघणार, आईच्या कॉटनच्या साड्यांची केलेली रजई बाहेर येणार, जुन्या आठवणी, जुन्या मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स फ्रेश चेहर्‍यांनी भेटणार..... गाडीवर जाताना उन्हानं होणारी मनाची काहिली थांबून मिलिंद ईंगळेच्या गारवा मधील ओळी आठवणार....

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा.......

पाऊस नक्की पाहिजे!! उष्णतेनं तापलेली धरा थंड जलधारांनी तृप्त करण्यासाठी.... मरगळलेल्या सृष्टीला नवचैतन्य देण्यासाठी..... नवीन पालवी, नवी फुलं नवी फळं, नव्या इच्छा, नवी स्वप्नं, नवा दिवस, नवा पाऊस आणि तोच आपला हवा हवासा ऋतू... आपला पावसाळा..... आकाश पाण्यानं भरून जईन, टप टप थेंब वाजतील.... पावसात भिजण्यासाठी, ते थेंब झेलण्यासाठी मन पुन्हा पुन्हा आतुर होईन...

ये पावसा ये.... लवकर ये.... Welcome Rain!!!

03 May 2009

कौतुक

आजच्या बहुसंख्य जणांना विचारलं की "आपला राष्ट्रीय खेळ कोणता हो?" आणि चुकून हॉकी असं बरोबर उत्तर दिलं तर मला, त्याला / तिला सांगावसं वाटेल की "बाबा, आता कोणीतरी क्रांती करा, संप, आंदोलनं करा आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी बदलून क्रिकेट करा." अरे किती तो क्रिकेटचा उदो उदो! जेवढे स्टार्स पुढे आलेत ना क्रिकेटच्या टिम्स साठी त्यातल्या एकानं तरी हॉकी प्रिमियर लिग साठी टिम स्पॉन्सर केली का? किमान त्यांना माहितिये का की आपल्या देशाचा खेळ हॉकी आहे म्हणून?


भारतात जेवढी दैना हॉकीची झालीये ना तेवढाच उदो उदो क्रिकेट्चा झालाय. एकट्या क्रिकेटलाच दोष नाही देत मी. तीच गत टेनिस, बॅडमिंटनची पण आहे. सानिया मिर्झा, महेश भुपती, लिऍण्डर पेस असे दोघं तिघं गिने चुने टेनिस प्लेअर्स... त्यांचा सत्कार आणि काय काय होतं पण अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारतानं मलेशियावर ३-१ अशी मात करत तब्बल १३ वर्षानी या करंडकावर आपलं नाव कोरलं!!! आपलं नाव..... भारतीय संघाचं नाव... किती अभिमानाची ही गोष्ट किती जणांनी साजरी केली? २००३ साली भारतीय क्रिकेट संघ विश्वकप स्पर्धेच्या पुढच्या फेरीत पोहोंचावा म्हणून देशभर जप तप आणि यज्ञ झाले होते! अझलान शाह करंडक खेळण्यासाठी भारताचा संघ कधी गेला हे कोणाला कळलं ही नाही. ना त्यांना शुभेच्छा द्या असं कोणत्या चॅनलवाल्यानी सांगितलं. आयडिया फोन सांगतो क्रिकेटर्सशी बोला म्हणून.... हॉकी प्लेअर्स कुठे गेलेत हो आपले???? १९९५ नंतर २००५ साली इंग्लंडने अशेस ही क्रिकेटची स्पर्धा जिंकली तर इंग्लंडच्या राणीनं राजवाड्यात पार्टी दिली होती. त्या टिमची ओपन बस मधून फेरी काढली होती. आणि महिना दिड महिना कौतुक चाललं होतं. आपण १३ वर्षांनी अझलान शाह करंडक जिंकला तर त्याचं फारसं नाव ही दिसलं नाही आपल्या चॅनल्सवर. आपल्या खेळाच्या किंवा आपल्या स्वतःच्या काही गोष्टीं बाबत आपण स्वतः इतके उदासीन का आहोत? आपण आपल्या खेळाचं, खेळाडूंच, कौतुक केलं नाही तर कोण करणार???