01 November 2010

कर्मबंध म्हणजे काय?

जीवन सुखोपभोगात घालवावे या साठी अनेक जण परीश्रम करतात. आपले कर्म करतात. हे कर्म महत्वाचे असते का? नाही. हे कर्म महत्वाचे नाही, तर कुठलं ही काम करताना, कर्म करताना 'बुद्धी कशी आहे?' हे महत्वाचं. याला योगबुद्धी म्हणतात. योग बुद्धीनं "कर्मबंधाचा" नाश होतो. कर्मबंध म्हणजे बंधनकारक कर्म. जसं कर्म असेन तसं फळ मिळतं. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळणार. जणू कर्म म्हणजे बीज!! बीज जर चांगलं असेन तर त्यातून निघणारं झाड चांगलंच निघतं. चांगल्या झाडाला चांगलं, निरोगी फळ लागतं. आणि निरोगी फळाचं निपजणारं नवीन बियाणंही कायम निरोगी येतं. हे एक चक्र आहे. आणि या चक्रात कायम भ्रमंती सुरू असते.
काही वेळा कर्म करताना मनःस्वातंत्र्य मिळत नाही. अशा वेळी कर्मे मना विरूद्ध करावी लागतात. उदाहरणा दाखल सांगायचं झालं तर, संतप्त जमावाला पांगवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यानं दिलेला लाठीमाराचा आदेश एक पोलिस शिपाई पाळतो. शिपायाला वाटत असेन की लाठी मारू नये. पण केवळ वरिष्ठांच्या आदेशापोटी तो लाठी चालवतो. हे ही कर्मबंध आहे. मी बघत नाही... मला बघावं लागतं. मी करत नाही.... मला करावं लागतं. हे सगळं कर्मबंध, पण याला कर्मस्वातंत्र्य नाही.
नैसर्गिक वृत्तीतून केलेली कामं हे जीवन असलं तरी हे चाकोरीतील जीवन. चाकोरीबद्ध जीवन. या नैसर्गिक वृत्तीच्या बाहेर पडणं ही मुक्तता. चाकोरीबद्ध जीवनात घडलेली कर्म "झाली" म्हणता येतात. "केली" म्हणता येत नाही.
कुठलंही कर्म करताना "बुद्धीची मुक्तता" ही कर्मबंधनाच्या विरुद्ध स्थिती आहे. त्यामुळे स्वधर्म पाळताना ते मुक्तबुद्धीनं करणं हे महत्त्वाचं. त्याशिवाय "स्वधर्माचरण केलं" असं म्हणता येत नाही. कर्म करताना बुद्धी मुक्त आहे की नाही हे महत्त्वाचे ठरते. स्वधर्माचं आचरण आणि कर्मफलाचा त्याग हे कर्मबंध!!!

भगवद्गीता अध्याय - २