31 May 2007

मेरी दुनिया

एक शांत रम्य संध्याकाळ! शांत समूद्र शांत लाटा... किनार्‍याकडे झेपावणर्‍या... नारळीच्या झाडातून वाहणारा वारा.... सगळं शांत होतं. मानसी एकटीच उभी होती.... न जाणे किती वेळ..... रेडियोवर वो लम्हेचं गाणं सुरू होतं... चल चले अपने घर ऎ मेरे हमसफर... "काय गं? कसला विचार करतेस?" अभीच्या या वाक्यानी मानसी भानावर आली. अभीच्या हातातला कॉफीचा मग घेत मानसीनं मान नुसतीच हलवली.
मानसी आणि अभी.... लहानपणापासूनचे मित्र. एकाच शाळॆत आणि एकाच वर्गात शिकलेले. दोघंही अभ्यासात अगदी हुषार नसले तरी ८५ ते ९०%च्या घरात होते. १२वी नंतर त्यांनी मिळूनच ईंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेला. अभीला कंप्युटर शाखा मिळाली तर मानसीला ईलेक्ट्रोनिक्स. दोघंही फर्स्ट क्लासचे विद्यार्थी. लहानपणाची ओळख नंतर प्रेमात बदलली हे फायनल ईयरच्या गॅदरिंग दरम्यान कळलं. कळलं म्हणण्यापेक्षा मित्र मैत्रिणींच्या चिडवण्यानं दोघं वेगळे झाले. आपण बोललो नाहीत की नंतर आठवण येते आणि हे जरा विचित्र आहे असं दोघांनाही जाणवलं. मानसीनं तसं बोलून दाखवलं... आणि अभी.... तो मात्र विचारून मोकळा झाला. "मानसी मी तुझ्या प्रेमात पडलोय... तू पडली आहेस का माझ्या प्रेमात?" मानसी दंग होऊन पाहतच राहिली. ती पुढं काही बोलणार त्याच्या आत अभी बोलला... "मी लगेच "हो म्हण" असं म्हणत नाहीये. तू विचार कर आणि मला सांग. कधी कुठे आणि कसं सांगायचं ते तू ठरव." नेहेमी प्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवून अभी शांत निघून गेला. रोज जाताना एकदा मागे वळून पाहणारा अभी आज वळला नाही. तो गेला त्या वाटेकडे मानसी खुप वेळ पाहत होती. अगदी तो नजरेआड होईपर्यंत. रोज एकत्र जाणारे दोघं आज वेगळे जात होते. ग्रुपला जाणवलं होतं की काहि तरी झालय... कुठं तरी बिनसलय. पण कोणी काही म्हणालं नाही. त्यांची मैत्री पुढे गेली असेल याचा कोणी विचारही केला नाही. सगळे अजूनही एकत्र बसत होते. त्यावेळी त्यांच वागणं वेगळं नसायचं. म्हणजे कोणाला तीळमात्र शंकाही आली नाही. पण आज दोघांना वेगळं जाताना पाहून सगळे चकित झाले होते.
दुसर्‍या दिवशी सगळ्य़ांनीच दोघांना घेरलं. "काय रे तुमचं भांडण झालं नाही ना?" एक ना अनेक सगळ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अभी नुसताच हसला.... मानसी कडे पाहिलं आणि तो गप्प बसला. " हे काय चाललय तुमचं?" चैताली वैतागून म्हणाली, " आपला ग्रुप एक आहे आणि इथं भांडणं सुरू करू नका.".... मानसी काही बोलणार इतक्यात अभीनं मौन तोडलं. "आमचं भांड्ण झालं नाहीये. बस्स थोडे दिवस बोलणार नाही आहोत. एवढच काय ते.!!!" अभीच्या या शांत उत्तरावर मानसी चपापली. बॉल आपल्या कोर्टात त्यानं सहज टाकलाय हे तिच्या लक्षात आलं. आणि आपल्या या अबोल्याचा जेवढा त्रास स्वतःला होतोय तेवढाच त्यालाही होतोय हे तिला जाणवलं. घरी कसं सांगावम या विचारात मानसी कॉलेज मधून निघाली. घरी अभी सगळ्यांनाच माहित होता. त्याच्याबद्दल घरी सगळे चांगलं बोलतात, सगळे त्याच्याशी चांगलं वागतात हे तिला माहित होतं. पण आपल्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या प्रेमाचा स्विकार करावा की करू नये या मनःस्थितीत होती ती. घरी सगळे चिडणार हे तिला वाटत होतं.
दरम्यान डिग्री संपली. आणि सगळेच आपापल्या मार्गी लागले. पुढले काही महिने दोघं अबोलच होते. अभीनं तिला कधी विचारलं नाही ना तो घरी यायचं थांबला. त्याचा वावर सहज होता. मानसीला काय करावं कळत नव्हतं. आणि या मनःस्थितीत सुलू मावशी धावून आली. तिनं सहजच अभीचं स्थळ सुचवलं आणि कोणी नाही म्हणू शकलं नाही. आणी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं ही. बोलाचाली झाल्या, साखरपुडा झाला, लग्नं ही पार पडलं. दोघांची नोकरी सुरू झाली. अभी आणि मानसीचा दिवस नोकरीत जायचा. संध्याकाळी दोघं एकत्र मिळूनच काम करायचे.
४ ५ वर्षात दोघंही नोकरीत जम बसवले होते. अभीजित टींम लिड झाला होता. त्याच्य़ स्वप्न विस्तारली होती. सकाळी साडे सात ते रात्री ९ पर्यंत तो नोकरीतच असायचा. घरी आलं की तो आधी सारखा तिच्या भोवती रुंजी घालायचा नाही. त्याचं आपलं काम आणि नोकरीच्या गप्पा असायच्या. मानसी विचार करायची मी कुठं चुकते आहे का?
आणि याच विचारात ती आज उभी होती. हा शांत समूद्र आपण किती वेळा अनुभवला आहे. किती वेळा त्याचा आवज ऐकला आहे, किती वेळा लाटेसोबत खेळलो आहोत... त्या पाण्यात भिजलो आहोत... पण आज हे सगळं वेगळं वाटतय! अभी दुरावल्यासारखा वाटतोय. माझा अभी....!! माझ्यासोबत होता तो, माझा मित्र, माझा सखा आज असा दुरावल्यासारखा वाटतोय. मला पाण्यात पडू नये म्हणून सगळ्य़ांसमोर बीचवर हात धरणारा अभी आज काल थोडा लांबूनच चालतोय.... आपल्याच विचारात. काही विचारलं तर म्हणे भविष्याचा वेध घेतोय!! विचार करतोय... "असं काय रे अभी?" आज मानसी न राहवून बोलली. "का?? काय झालं?" अभी म्हणाला. "अरे, किती दिवस असा अबोल राहणार आहेस?" "मी? छे गं तुझं आपलं काही तरीच सुरू असतं!!" "तसं नाही रे अभी. पण किती दिवस असा कामाच्या मागे धावणार आहेस? आपण किती दिवसात निवांत बोललो नाही. हात धरून बीच वर चाललो नाही..... मानसी पुढे बोले पर्यंत अभी पट्कन पुढे आला. मानसीचा हात धरून म्हणाला,"मी हे आपल्यासाठी, आपल्या घरासाठीच करतोय ना." तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला,"जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. मग सेव्हींग सहज बाजूला पडते. खर्च करायला हात सैल राहतो. आपलं बालपण काटकसरीत गेलं. मग आता थोडे जास्त कष्ट केले की थोडी करमणूकीसाठी मोकळा खर्च करता येतो." अभी बोलत होता. मानसी मन घट्ट करून ऐकत होती. "अरे पण या पैशाच्या मागे किती दिवस पळायचं?"
लग्नानंतर सगळं खुप छान सुरू होतं. पण मानसी एकटी पडली होती. आज खुप दिवसांनी अभीनं शनिवारी सुट्टी घेतली होती. दोघं समूद्रावर फिरायला गेले होते. कित्येक दिवसांनी हातात हात घालून गेले होते दोघं. मानसी हळवी झाली होती. अभीचा हात तिला सोडावासा वाटत नव्हता. एक दोन वेळा त्यानं सोडवून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण मानसीनं घट्ट धरून ठेवला होता. कसं बोलावं यासाठी ती तयारी करत होती. शब्द शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाक्य जुळवता येत नव्हतं. "तू मला सगळं आयुष्य मदत केलीस रे!! कशाची कमी भासू दिली नाहीस. तुला कोणीही पैशाचा तगादा लावला नाहीये. अभी, घरी सगळे तुझ्याबद्दल विचारतात. तुझी काळजी घेतात. मी आहेच रे पण आई बाबा सुद्धा!!! माझी नोकरी आहे तुझी नोकरी आहे. आपला पगार मिळून निवांत मोकळा खर्च करू शकतो रे अभी. अरे, ही वाट जिच्यावर तू चालला आहेस ना ती तुला आम्हा सगळ्यांपासून दूर नेते आहे. अरे पैसे कमावणं आणि तो खर्च करणं हे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी इतरांच्या मनाचा विचार कर ना. माझा विचार कर... आपण गेल्या कित्येक दिवसांत एकत्र बसून बोललो नाहीत. ना तू मला विचारलसं तू कशी आहेस म्हणून.... आपण मिळून बाहेर गेलो नाहीत. आपलं ऑफिस, मिटींग्स, टुर्स.... वेळ घालवतोय असं म्हणायचं नाहीये मला. पण मला भिती वाटतिये तू दुर जातोयस माझ्यापासून......" न बोलावसं वाटणारं वाक्य शेवटी मानसी बोलून गेली.
खुप वेळा तिच्या मनात हे वाक्य येऊन गेलं होतं. पण ती बोलली नव्हती. आपल्याच विचारात मानसी पुढे गेली. अभीनं हात कधी सोडवून घेतला हे तिला कळलं ही नाही. समूद्राची लाट पायावरून गेली. थंड पाण्याच्या स्पर्शानं ती भानावर आली. अभी मागं राहिल्याचं तिच्या लक्षात आलं. वळून पाहते तो अभी दोन शहाळी घेउन येत होता. खुप दिवसांनी शहाळं शेअर केलं. मानसीनं हात धरला नव्हता. अभीनं पुढे होऊन हात धरला. एका स्टॉलवर गाणं लागलं होतं....

पत्थर के ईन रस्तोंपे
फुलों की एक चादर है
जबसे मिले हो हम को
बदला हर एक मंजर है!!

22 May 2007

मी टेनिस खेळले..

रवीवारी आमच्या "अहों"ना ऑफिसचं काम लागलं होतं. एका प्रोजेक्ट्चं रिलिज होतं. संध्याकाळी ४पर्यंत काम संपलं आणि मित्राचा फोन आला "बायको पोरासोबत ये पार्कला आम्ही पण येतोय". आम्ही तयार होऊन गेलो. आणि मला खेळावं लागेल याची सुतराम कल्पना नसल्यानं मी पंजाबी ड्रेस घालून गेले होते. पण नेहेमी पार्कला गेले की मी किमान १५ मिनिटं ब्रिस्क वॉक घेते. त्यामूळे ड्रेस कोणताही असला तरी मी स्पोर्ट शुज नक्की घालते. चालत रमत गमत मी आमचे हे आणि चिरंजीव पार्कमधे पोहोंचलो. मित्राला यायला थोडा वेळ होता, तोपर्यंत चिरंजीवाच्या मागे आमचा वॉक झाला. मित्र आणि त्यांचा चिरंजीव आले आणि यांनी डिक्लेअर केलं," आम्ही टेनिस खेळायला चाललो तू पोरांवर लक्ष ठेव...." आणि मला दोन मुलांच्या तावडीत सोडून या दोघांची गच्छंती झाली टेनिस कोर्टाकडे. मी मनात म्हणाले "लवकर थकू दे देवा दोघांना" कारण दोन मुलांना सांभाळणं अशक्य नसलं तरी अवघड होतं....

थोडावेळ खेळून झाल्यावर आमच्या चिरंजीवाला पप्पांची आठवण आली... आणि ती संधी साधून मी मोबाईलवरून कुठल्या कोर्टावर खेळत आहेत याचा मागमुस लावला. एका मुलाला सायकलवर बसवून आणि दुसर्‍याला हातात धरून आम्ही टेनिस कोर्ट क्रमांक १ ला पोहोंचली. आणि माझी टेनिस कोर्टाजवळ आगमन झालं....

यांनी गेम डिक्लेअर केला होता त्यामुळे त्यांचा गेम पुढे चालू ठेवायचा मला चान्स मिळाला. आणि रॅकेट हातात घेऊन स्टेफी ग्राफ़च्या आविर्भावात (पंजाबी ड्रेस आणि स्पोर्टस शुज घालून :)) मी कोर्टावर एंट्री केली... एकवार सभोवताली नजर टाकली(जशी स्टेफी टाकते तशी...) टाळ्यांचे आवाज डोक्यात घुमले..... "so shud I serve now?" या प्रश्नानं मी भानावर आले. मी 'स्टेफी' नसून 'सोनल' आहे या वास्तवात आले. थोडावेळ गेम छान चालला.... मला खेळायला जमत होतं. माझे रिटर्न शॉट्स जिथे पाहिजे तिथेच पडत होते... आणि माझ्याकडे आलेले शॉट्स मला व्यवस्थित रिटर्न करता येत होते ... एकूणच खेळ चांगला चालला होता... आणि मला माझंच कौतुक वाटत होतं... पुन्हा स्टेफी झाल्यासारखं वाटत होतं... आणि इथेच अतिविश्वास नडला.... एका रिटर्नला माझे शुज उचलल्याच गेले नाहीत... जणू जमिनीला चिकटून बसले होते. आणि इतका वेळ मनोभावे खेळणार्‍या सोनलरूपी स्टेफीने कोर्टावर लोळण घेतली...

गुडघा खरचटला होता जोरात.... हाताचा तळवा सोलला होता. मला जोरात लागलं आहे याची जाणीव झाली होती... पण मनातली स्टेफी स्वस्थ कशी बसेल???? "काही नाही" असं म्हणत मी पुन्हा खेळले.... यांच्या मित्रासोबत एक गेम खेळून दुसरा आमच्या अहोंसोबत खेळायला सुरू केला आणि अर्ध्या गेममध्ये गुडघ्यानी साथ सोडली. जाम ठणक बसली होती.... इतका वेळ "काही नाही" म्हणणारं माझं स्टेफीरूपी मन आता वास्तवात येऊन सोनल बनलं होतं.... गेम सोडून घरी यायचा निर्णय घेतला...

परतीच्या वाटेवर स्टेफी नसलेली सोनल लंगडत चालायला सुरू झाली होती... गुडघा आता कोणत्या अवस्थेत दिसणार याचा विचारही करवत नव्हता.... सलवारला रक्ताचे २ ३ डाग होते. तिथे बघवत नव्हतं. घरी येऊन चिरंजीव आणि अहोंनी ड्रेसिंगचं सामान काढलं.... "चला आता स्टेफी ग्राफची ड्रेसिंग करू" या डायलॉगनी ड्रेसिंगची सुरूवात करण्यासाठी गुडघा पाहिला की हादरूनच गेले.... दोन ठिकाणी सॉलिड जखम झाली होती... खोल जखम होती... शिवाय ३ ४ ठिकाणी हलकं खरचटलं होतं.... अल्कोहोल वाइप्स लावले आणि तोंडातून जोरात किंकाळी बाहेर पडली.... खुप आग झाली.... कापूस ठेऊन मग रात्री झोपले.

सकाळी पाय ठणकत होता. तळवा पण हुळहुळत होता.... दिवस लंगडत काढला... चिरंजीवांकडून दिवसभर थोडी फार सेवा झाली. संध्याकाळी पुन्हा ड्रेसिंग करताना जखमेची "खोली" दिसली... इथे छोट्या छोट्या जखमांना दवाखान्यात जाता येत नाही.. जर प्रथमोपचारानं दुरुस्ती नाही झाली तरचं तेथे जाता येतं.... त्यामुळं घरीच सगळं करावं लागणार होतं.... दोन मोठ्या जखमांपैकी एकीत पू होण्याची शक्यता यांनी वर्तवली... ड्रेसिंग करताना पुन्हा एकदा आरडा ओरडा किंकाळ्या झाल्या... आणि शेवटी जखम मोकळी ठेवायचं ठरवलं....

लागल्यामुळं लाड झाले... रात्री पिझ्झा मागवला... सकाळी जेवायची घाई करू नकोस मी बघतो असं प्रेमळ आश्वासन मिळालं.... आणि मी ठणकता पाय घेऊन निद्राधीन झाले... रात्री स्वप्नात स्टेफी आली होती.... पाय कसा आहे विचारत होती... आणि मी "काही नाही गं! बस ना!" अशा प्रेमळ गप्पा मारत होते....

02 May 2007

निर्वाणषटकावरील विवेचन

आद्य श्री. शंकराचार्यांनी अनेक संस्कृत स्तोत्र, षटक लिहिली आहेत. त्यात त्यांचे वेदसारशिवस्तव, शिवनामावल्याष्टकम्, आणि निर्वाणषटकम् प्रसिद्ध आहेत. चिदानंद रुपम् शिवोहम् शिवोहम् हे त्यांचे निर्वाणषटक. त्यालाच आत्मषटक असेही म्हणतात.

यामागची कथा अशी की, एकदा शंकराचार्य आपल्या गुरूकडे गेले. गुरू आपल्या पर्णकुटीत बसले होते. बाहेरची चाहूल लागताच त्यांनी आतून विचारले,"कोण आहे?" आपल्या गुरूच्या या प्रश्नाचे श्री. शंकराचार्यांनी जे उत्तर दिले ते आत्मषटक, निर्वाणषटक या नावाने प्रसिद्ध आहे.

सर्व सामान्य माणसाप्रमाणे,"मीच आहे" असे उत्तर न देता गुणातीत स्थितप्रज्ञासारखे त्यांचे उत्तर, हे आत्मषटक. हे निर्वाणषटक आपल्याला खुप काही शिकवून जाते. त्यांच्या या आत्मषटकाचे वैशिष्ठ्य म्हणजे पहिल्या तीन ओळीत ते मी कोण नाही हे सांगतात व चौथ्या ओळीत ते खरे कोण आहेत हे एकाच शब्दात पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे त्यांच्या या स्तोत्राचा आपल्या मनावर विशेष प्रभाव पडतो. त्यांचे वेगळेपण मोठेपण महानपण सर्वच भव्य दिव्य आहे हे समजून येते.


मनोबुध्यहंकार चिताने नाहं । न च श्रोतजिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमी न तेजू न वायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ १ ॥

या श्लोकात पहिल्या ३ ओळीत ते काय नाहीत ते सांगत आहेत. आपले शरीर हे अष्टधा प्रकृतीचे बनले आहे. त्यात पंचमहाभूते ज्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, व आकाश यांचा समावेश होतो. तर सूक्ष्म तत्वात मन, बुद्धी व अहंकार यांचा समावेश होतो. म्हणजेच पंचमहाभूते व मन, बुद्धी व अहंकार यांनी हा देह बनला आहे. या पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह शेवटी यातच विलीन होतो. म्हणजे ज्याचे घेतले त्यालाच दिले. आपले काही नव्हतेच. पंचमहाभूतातून आले आणि तेथेच गेले. जे आपले नाही त्याला आपले म्हणणे अयोग्य. ती एक प्रकारची चोरीच. तेंव्हा ज्याचे त्याच्या जवळ दिल्यावर आपल्या जवळ या नश्वर देहाचे काही उरतच नाही. त्यामूळे या देहाचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय असं काहीच त्यांचे नाही. ज्या नाक, कान, डोळे, जीभ, व त्वचा या मूळे जे सूख किंवा दुःख मिळाले ते ही माझे नाही. सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही. आणि त्यामूळेच त्यांच्यातील (शंकराचार्यातील) गुणातीत, स्थितप्रज्ञ पुरूष जाणवतो. जे आपलं नाही त्याला शंकराचार्य आपलं म्हणत नाहीत. मग उरलं काय? ह्या चराचर सृष्टीत दोनच गोष्टी आहेत एक देह दुसरा देही, एक शरीर दुसरा शरिरी, एक देह दुसरा आत्मा, एक क्षेत्रज्ञ तर दुसरा क्षेत्र, आपला नश्वर देह ही आपला नाही. म्हणजे जे आपल्या जवळ उरतो तो अविनाशी देही, आत्मा. तो मात्र आपला, ईश्वराचा अंशरूप. आणि मग म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात की, मी मन, बुद्धी, अहंकार, नाक, कान, जीभ, त्वचा, डोळे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातील मी काहीच नाही. उरलेला प्राण, उरलेला आत्मा तोच मी आहे. आणि हा आत्मा कसा आहे?? तर तो भगवंतरूप शिवरूप, सत चित आनंदरूप, शिवरूप आहे.


न च प्राण संज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुर्न वा पंचकोश ।
न वाक् पाणी पादौ न चोपस्य पायु । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ २ ॥

वायू हा प्राण आहे. प्राण म्हणजे एक शक्ती जी शरीरात चेतना निर्माण करते. हा प्राण सर्वच सजीवात असतो. अगदी एकपेशीय सुक्ष्म जीवांपासून प्रचंड देवमाशातही एकच प्राण, भगवंताचा अंश असतो. हा प्राण वायूच्या वर अवलंबून असतो. बहिणाबाईंनी म्हटले आहे
आला प्राण गेला प्राण
एका सासाचं अंतर
अरे जगण मरण
सासा सासाचं तंतर ॥

एक श्वास सजीवातील चैतन्य आहे की संपलं हे दाखवून देतो. म्हणूनच आपण चैतन्यमय प्राण असं म्हणतो. तर हा प्राण वायूवर अवलंबून असतो. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. आत्म्याने निर्माण केलेली शक्ती म्हणजे प्राण. म्हणजे प्राण हा परमात्म्याचा अशं झाला, भाग झाला. प्राणाचे पंचक व्यान, समान, अपान, उदान व प्राण होय. हे सर्व व वायू मिळून प्राण अर्थात आत्मा झाला.
शंकराचार्य म्हणतात की जो प्राण, पंचवायू म्हणजे आत्म्याचा एक भाग झाला तो आत्माच परमेश्वराचा अंश आहे. माझे काहीच नाही. तसंच हे शरीर, हा देह सप्तधातूंनी बनला आहे. ते सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मेद, स्नायू, अस्थी, मज्जा, व शुक्र होय. अन म्हणजे गती, हालचाल करणे. आन म्हणजे नेणारा, गती देणारा.

प्र + आन = प्राण म्हणजे प्रकर्षाने नेणारा. हा मुख्यतः रक्तात असतो.
अप + आन = अपान म्हणजे खाली नेणारा. शरीरातील रसात अपान फिरत असतो.
उद + आन = उदान म्हणजे वर नेणारा. वर नेण्याचे काम स्नायू करतात. म्हणून उदानाचे काम स्नायूत असते.
सम + आन = समान म्हणजे समतोल राखण. हे कार्य हाडांचे.
वि + आन = व्यान म्हणजे विशेष हालचाल हे कार्य चरबी, मेदाचे असते.

शंकराचार्य म्हणतात हा प्राण, हा वायू, हा सप्त धातू, हा पंचकोश हे माझे नाही. कारण हे सर्वच देहाशी निगडीत आहेत. त्यांचा व्यवहार देहाबरोबर चालतो. देहातले चैतन्य संपले की त्यांचे कार्य ही संपणार. आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आत्मा आहे तसाच राहील.

तसंच वाक, पाणी, पादौ, चोपस्य, पायु हे सर्व शरीराशी, विनाशी तत्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे शरीरासोबतच त्यांचे व्यवहार चालणार. देह पडला, शरीराचा नाश झाला, शरीरातील चैतन्य निघून गेले, शरीर मृत झाले की यांचे कार्य संपले. म्हणजे जे शरीराशी निगडीत ते शरीरासोबत संपणार. शंकराचार्य म्हणतात की हे सर्व शरीरासोबतच जाणार असल्याने माझे नाहीच. तेंव्हा जे माझे नाही त्या बद्दल मला काही वाटत नाही. म्हणूनच मी माझ्या भगवंतरूप आत्म्याचा. मी फक्त शिवरूप आणि शिवरूपच आहे. माझ्या शरीराचा व्यापार चालवणारे तत्व माझे नाही. शरीराचे असित्व असलेले पाच कोष ( अन्नमय, प्रानमय, मनोमय., विज्ञानमय, आनंदमय) मी नाही. ज्या कर्मेंद्रियांच्या कर्तृत्वाचा सर्वांना अभिमान असतो तिच आपली नाहीत. आता मी काही बोलू सुद्धा शकत नाही. कारण माझी वाणी ही माझी नाही. म्हणून मी उरलो तो मंगलमय शिव!!


न मे द्वेष रागो न मे लोभ मोहौ । मदे नैव मे नैव मात्सर्यभाव ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ३ ॥

द्वेष, राग, लोभ, मोह, मद, व मात्सर्य (मत्सर) हे सर्व मनाचे भाव. पण पूर्वीच्या दोन श्लोकांवरून लक्षात येते की अष्टधा प्रकृतीच जेथे आपली नाही तेथे त्यातले मन ही आपले नाही. आणि त्या मूळेच मनाशी निगडीत भावही आपले नाहीत. अतःकरण चतुष्ट्याचं वार्‍यावर विरून गेल्याने धर्म, अर्थ, काम, आणि मोक्षही त्या चतुष्ट्या बरोबर वार्‍यावर विरून गेले. मनच मी नसल्यानं माझ्यातील अहं पुर्ण पणे गेल्याने मनाचे विकार ते सारे विरून गेले, नाहिसे झाले. त्या भावनाच गेल्याने त्यांच्यामुळे येणारे दोष ही विरून गेले. त्यामुळे दागिन्यातला दाग काढला तर १०० नंबरी शुद्ध सोनं उरतं तसं "मी पणा" विरून गेल्यानं फक्त आत्मारूप परमेश्वराचा अंश उरतो. म्हणून आचार्य म्हणतात की मनाचे सर्व विकार जाऊन मी निर्विकार झालो आहे. सत चित आनंदरूप शिवरूप बनलो आहे.

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् । न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ४ ॥

पाप आणि पुण्य तसेच सुख आणि दुःख या भावना मनाशी निगडीत असतात. आता येथे मन पूर्णतः विकारमुक्त झाले आहे. त्यामुळे तेथे ना पाप ना पुण्याची मोजदात आहे ना सुख दुःखाचे उमाळे. मन आनंदाने भरून जाणारही नाही आणि दुःखाने व्याकूळही होणार नाही. कारण मी स्थितप्रज्ञ झालो. मंत्राचे पठन, तिर्थांचे दर्शन तसंच वेदपठण, तसंच यज्ञयाग इत्यादि क्रिया आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. काही लोक या क्रिया रोजच करतात. तर काही प्रासंगीक करतात. या सर्वाने मनाला शांती मिळते. व गाठीस पुण्य जमा होते. पदरी पुण्य संचय वाढतो. पण वर लिहिल्या प्रमाणे लोकांमधे पाप पुण्याच्या कल्पना ज्या मनाशी निगडीत आहेत त्या मनासोबतच विरून गेल्या. त्यामूळे पाप पुण्याचा विचार संपला.

आता आचार्य म्हणतात "अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता" भगवंत गीतेच्या १५व्या अध्यायात म्हणतात

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम ॥"

अर्थात भगवंत म्हणतात मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणरा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. आचार्य म्हणतात " अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता". आचार्यांना माहित आहे आपल्या जठरात भगवंत आहे. त्यामुळे भोजन म्हणजे निसर्ग साखळिने निर्माण झालेले ब्रह्मरूप भोजन म्हणजे अन्न हे ही भगवंतच. मी जेवणारा, मीच जेवण, व जेवण करून तृप्त होणारा भोक्ता ही मीच. अन्न ही मीच, जेवणारा ही मी आणि पचविणारा व तृप्ती घेणारा ही मीच. करण, कारण, कर्ता, सर्व मीच अर्थात भगवंत. जसं गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात,

"ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्तह्मणा हुतम ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥"

अर्थात, यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवा आदि ही ब्रह्म आहे. हवन करण्याजोगे द्रव्यही ब्रह्म आहे. तसंच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमध्ये आहूती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणार्‍या योग्याला मिळवण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.

यज्ञही भगवंत, स्त्रुवाही भगवंत, द्रव्य ही भगवंत, कर्ता ही भगवंत, अग्नी ही भगवंत, अग्नी ही भगवंत, फळही भगवंत, सारे काही भगवंत.

तसंच आचार्यांना माहित आहे की भोजन ही भगवंतरूप आहे. भोज्य आणि भोक्ता ही भगवंत रुप आहे. 'मी' हे काही नाही आहे. त्यामूळे 'मी पणा' पूर्ण गेला असल्याने जो राहिला तो शिवरूप आत्मा. म्हणून आचार्य म्हणतात की मी सत चित आनंदरूप मंगलरूप शिवरूप आहे.


न मे मृत्यू न मे जातीभेदः । पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बंधुर्न मित्रं गुरू नैव शिष्यः । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ५॥

सर्व काही भगवंत रूप झाले आहे. आता आचार्य या श्लोकात गीतेचे मूळ तत्व, पुनर्जन्म, या बद्दल सांगत आहेत. गीतेच्या तत्वानुसार जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चितच. या जन्मी कृत्य करू त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म आहेच. पण मानवी जन्माचे सार्थक म्हणजे मोक्षपद गाठणे. पुनर्जन्माच्या चक्रव्युहातून सुटका करून घेणे. हे सारे ज्ञान आचार्यांना आहे. म्हणून आचार्य या श्लोकात म्हणतात " माझ्या मनात मृत्यूबद्दल शंकाच नाही. कारण जाणारा माझा देह आहे आत्मा नाही. अर्थातच अविनाशी आहे. परत आतापर्यंतचे काम भगवंताला अर्पण केले आहे. त्यामुळे त्या कर्माचे व कर्म फळाचे ही बंधन मला नाही. त्यामुळेच कर्मफळ भोगण्यासाठी जन्माला येण्याची भिती ही नाही. पुढचा जन्म कोणता? जात कोणती याचा विचार करण्याची गरज नाही. कारण खात्री आहे या जन्मात मुक्त होणार. म्हणूनच मनात मृत्युबद्दल शंका नाही.
"पिता नैव माता न जन्मः" असं आचार्य म्हणतात. आपला जन्म होण्यासाठी माता पिता हे एक माध्यम आहे. पण जन्मच नसल्यानं माता आणि पिता ही राहणार नाही. बंधूही राहणार नाही. मित्र ही नाही. आता राहिला शिष्य आणि गुरू!!! आचार्य म्हणतात, " मोक्षपद अढळ असल्यानं शिवरूप गुरूत समाऊन जाणे निश्चित आहे. गुरूत एकरूप झाल्यानं गुरू शिष्याचे अद्वैत रूप झाल्याने ते दोघे वेगळे नाहीत. एकरूप झाले. ते एकरूप म्हणजे शिवरूप होय.


अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणां ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध । चिदानंदरुप शिवोहं शिवोहं ॥ ६ ॥

या सहाव्या श्लोकात आचार्य आपण शिवरूप आहोत याचे अधिक स्पष्टीकरण देत आहेत. ते म्हणतात, "माझा कोणी विकल्प नाही. तसाच मी निराकार रूप आहे. माझा कुठलाही एक आकार नाही. मी सर्व आकारांना व्यापून टाकले आहे. मी आणि भगवंत एकच विभूती. जसा भगावंत निर्विकार तसाच मी ही. त्यामूळे सारे आकार भगवंतातूनच निघून तेथेच विलीन होतात, नाश पावतात, लय पावतात. त्या सार्‍या आकारात इंद्रिये ही आली. कारण ती कुठल्याही आकाराहून वेगळी नाहीत. म्हणूनच मी शिवरूप.
सदा मे समत्वं - भगवंताच्या मनात समत्वाची भावना असते. "समत्वं योग मुच्यते" सर्वांना समानतेने पाहणारे भगवंत असल्याने आचार्यातील शिवरूपही भगवंतास दिसतेच. म्हणूनच आचार्य म्हणतात की मी बंधमुक्त आहे. समत्वाची भावना असल्याने "जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत।" हीच भावना आचार्यांच्या मनी आहे. समत्वामूळे कर्मबंधनाची भिती नाही. कुठलेही बंधन नाही. म्हणून आचार्य मुक्त आहेत. म्हणून ते म्हणतात मी मुक्त आहे, शिवरूप आहे, मंगलरूप आहे. सत चित आनंदरूप आहे. मी गुणातीत आहे, मी स्थितप्रज्ञ आहे. मी शिव आहे.



आपल्या स्वतः बद्दल पूर्ण खात्री असल्याने गुरूच्या "कोण आहे?" या प्रश्नाला त्यांनी आपण दुसरे तिसरे कोणी नसून सत चित आनंदरूप, शिवरूप आहोत हे उत्तर दिले. आचार्य हे ठाम पणे सांगू शकतात कारण त्यांनी आत्म परीक्षण केले आहे. त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे हे त्यांना ही माहित आहे. म्हणूनच तेवढ्याच जबाबदारीने त्यांनी स्वतः बद्दल ही सांगितले.